कळवा हॉस्पिटल वर दुरुस्तीच्या नावाखाली केला जाणारा खर्च वाया जाणार असून या रूग्णालयाचीच क्षमता वाढवावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अविनाश जाधव यांनी केली आहे. शिवाय ग्लोबल हॉस्पिटलच्या ठिकाणी जितोला देण्यात आलेली जागा काढून घेऊन त्या ठिकाणी कळवा हॉस्पिटल सुरू करावे, अशी मागणी देखील त्यांनी केली. जितोवर एवढी मेहरबानी कशाला असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. जितोला इतर ठिकाणी पर्यायी जागा द्यावी, असेही जाधावांनी सुचवले आहे.
आनंद दिघेंच्या नावाने कॅन्सरसाठी अत्याधुनिक हॉस्पिटल उभं राहावं, पण हे ज्या ट्रस्टला दिलं आहे, त्यांना खर्च करु द्या. महापालिकेच्या खर्चात तयार झालेल्या गोष्टी त्यांना का देण्यात येत आहेत, ते कोणाचे जावई आहेत का? असा सवाल जाधवांनी विचारला आहे. यासंदर्भात चौकशी केली असता आपल्याला यात लागेबंधे नाहीतर पूर्ण दोरच मिळेल, असा उच्चार जाधवांनी केला आहे.