ठाणे महापालिकेनं श्रीगणेश विसर्जनासाठी ४२ ठिकाणी पर्यावरणभिमुख विसर्जन व्यवस्था निर्माण केली आहे.
ठाणे हे तलावांचे शहर असून पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून तलावांचे संवर्धन व्हावे यासाठी गेली अनेक वर्षे ठाणे शहरातील घरगुती गणेश मूर्तीचे विसर्जन हे तलावात न करता ठाणे महापालिकेच्या माध्यमातून तयार करण्यात येत असलेल्या कृत्रिम तलावात केले जाते. यावर्षी ठाणे शहरात कृत्रिम तलावांची संख्या वाढविण्यात आली असली तरी नागरिकांच्या सोईसाठी शहरातील विविध 42 ठिकाणी टाकीमध्ये विसर्जन व्यवस्था करण्यात येणार आहे. जमिनीत खड्डा न खणता जमिनीवर कृत्रिम तलाव निर्माण केले जाणार असून नागरिकांनी पर्यावरणभिमुख घरगुती गणेश विसर्जन करावे असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे. घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जन हे दीड, पाच, सात, नऊ आणि अनंत चतुदर्शी दिवशी मोठ्या प्रमाणावर होत असते. नागरिकांची विसर्जन घाटावर गर्दी होवू नये तसेच पर्यावरणभिमुख गणेश विसर्जन व्हावे यासाठी शहरातील गृहसंकुले, नागरीवस्ती अशा विविध 42 ठिकाणी टाकीमध्ये विसर्जन व्यवस्था करण्यात येणार आहे. दोन फूटापर्यंतच्या गणेशमूर्तीचे विसर्जन यामध्ये करता येईल असे मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांनी नमूद केले. बोरीवडे गाव येथील मैदान- ब्रह्मांड ऋतुपार्क, बायर हाऊस-कोलशेत- रेवाळे तलाव – माजिवडा, घोलाईनगर कळवा पूर्व -खारेगाव तलाव, न्यू शिवाजी नगर -कळवा, मासुंदा तलाव दत्त घाट- नौपाडा, घोसाळे तलाव, कृत्रिम तलाव – उथळसर, उपवन तलाव पायलादेवी मंदिर, नीळकंठ ग्रीन्स- वर्तकनगर प्रभाग समिती, रायलादेवी 1- रायलादेवी -2 – वागळे इस्टेट, खिडकाळी तलाव-मुंब्रा, दातिवली तलाव- दिवा या ठिकाणी नव्याने कृत्रिम तलाव निर्माण करण्यात आले आहेत. तरी ठाणेकरांनी पर्यावरणभिमुख गणेश विसर्जन व्यवस्थेला सहकार्य करावे असं आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केलं आहे.