विष्णूनगर मधील आंबा विक्री केंद्रावरून धुमसत असलेला वाद सुरूच असून पालिकेच्या कारवाईविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आज धरणं आंदोलन केलं. गेल्या तीन वर्षापासून उभारल्या जात असलेल्या या आंबा विक्री केंद्रावरून यंदा वाद होण्यामागे भारतीय जनता पक्षाच्या एका नगरसेविकेचा वैयक्तीक हेतू असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अविनाश जाधव यांनी केला. या नगरसेविकेच्या एका प्रकल्पास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं विरोध केल्यामुळं या नगरसेविकेनं या आंबा विक्री केंद्राला विरोध केल्याचा आरोप अविनाश जाधव यांनी यावेळी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरअध्यक्ष आनंद परांजपे यांनीही या धरणं आंदोलनाला भेट देऊन आपला पाठिंबा दर्शवला. यावेळी परांजपे यांनी अविनाश जाधव यांना आंबा भेट देऊन पाठिंबा दिला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या धरणे आंदोलनाला बळ मिळालं. या भेटीनंतरच पुन्हा विक्री केंद्र उभारण्यास सुरूवात करण्यात आली. या ठिकाणी पुन्हा विक्री केंद्र उभारलं जाईल असं अविनाश जाधव यांनी यावेळी बोलताना सांगितलं.