कोरोनाच्या आपत्तीनंतर सर्वसामान्य नागरिकांवर निर्माण झालेले आर्थिक संकट अद्यापि कायम असल्यामुळं मालमत्ता कर आणि पाणीपट्टी बिलाच्या वसुलीसाठी जाहीर करण्यात आलेल्या अभय योजनेला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ द्यावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक नारायण पवार यांनी महापालिका आयुक्त आणि महापौरांकडे केली आहे. अभय योजना ही ३१ जानेवारीपर्यंतच जाहीर करण्यात आली आहे. कोरोनाच्या आपत्तीमध्ये सुमारे ६ महिने शहरातील व्यवसाय आणि चाकरमान्यांच्या नोक-या बंद होत्या. बहुसंख्य कुटुंबांना सध्या दैनंदिन खर्च भागवणंही जिकीरीचं झालं आहे. अभय योजनेमध्ये आता केवळ महिनाभराचा कालावधी शिल्लक असून ही मुदत वाढवल्यास २ महिन्यांच्या काळात सामान्यांनाही याचा फायदा मिळू शकेल. महापालिकेकडून मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुलीसाठी कठोर मोहिम हाती घेण्यात आली आहे. महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होणं गरजेचं असलं तरी कोरोना आपत्तीनंतर होणारी कर वसुली अन्यायकारक असल्याकडे नारायण पवार यांनी लक्ष वेधलं आहे.