शहरातील अंतर्गत मेट्रो प्रकल्प हा जनतेच्या अपेक्षेनुसारच पूर्ण केला जाईल. अधिवेशन संपल्यानंतर १५ दिवसात बैठक घेऊन याबाबत निर्णय घेण्याचं आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलं आहे. शहरातून जाणा-या नियोजित भूमिगत अंतर्गत मेट्रोमुळं नौपाड्यातील ५० हून अधिक इमारतींचं पुनर्वसन रखडलं आहे. याविरोधात नौपाड्यातील रहिवाशांनी महापालिकेसमोर आंदोलन केलं होतं. यावर आमदार संजय केळकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना सामंत यांनी हे आश्वासन दिलं. शहरामध्ये मेट्रोचा मार्ग ३ किलोमीटर भूमीगत आहे. त्यामुळं जुनं ठाणं म्हणजे नौपाड्यातील विकास होऊ शकत नाही. अनेक इमारतींच्या पुनर्वसनाचा प्रश्न रखडला आहे. त्यामुळं रहिवासी अस्वस्थ आहेत. हा मार्ग उन्नत केल्यास वेगानं पूर्ण होऊन खर्चही कमी होईल. त्यामुळं राज्य शासन हा मार्ग उन्नत करणार का, पुनर्विकासासाठी ना हरकत देणार का असा प्रश्न केळकर यांनी विचारला होता. अंतर्गत मेट्रोचा काही भाग उन्नत करण्याबाबत हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत. केळकर यांनी याप्रकरणी मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा केली आहे. या भागातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करूनच प्रकल्प पूर्ण केला जाईल आणि अधिवेशनानंतर १५ दिवसात इमारतींच्या पुनर्विकासासाठी परवानगी देण्याबाबत बैठक बोलवली जाईल असं उदय सामंत यांनी सांगितलं.