कर्जबाजारी झाल्याने कर्ज फेडण्यासाठी अंडी भरलेला ट्रक पळवून नेणा-या त्रिकुटाला ठाणे पोलीसांनी जेरबंद केलं आहे. एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. हैद्राबाद येथून अंबरनाथ इथे अंड्याने भरलेला ट्रक येत असताना अंबरनाथ-बदलापूर रस्त्यावर काही अज्ञात चोरट्यांनी ट्रकसमोर कार आडवी घालून ट्रक चालक महम्मद शेख आणि त्याच्या १७ वर्षीय मुलाला मारहाण करत अपहरण करण्यात आलं होतं. दोघांनाही मारहाण करून नंतर सोडून देण्यात आलं होतं. त्यानंतर या चोरट्यांनी अंडी भरलेला ट्रक पळवून नेला होता. ट्रक चालकाच्या तक्रारीनंतर याचा तपास ठाणे गुन्हे शाखेच्या उल्हासनगर युनिटकडे सोपवण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी तीन वेगवेगळी पथकं तयार करण्यात आली होती. या पथकांना तपासादरम्यान भिवंडीतील अन्सारी नामक व्यक्ती या प्रकरणाचा सूत्रधार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्याची चौकशी केली असता त्यानं काही साथीदारांच्या मदतीनं हा ट्रक लुटल्याची कबुली दिली. पोलीसांनी चोरीस गेलेला ट्रक, त्यातील १ लाख १६ हजार अंडी आणि आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली कार असा १४ लाखांचा ऐवज हस्तगत करून त्रिकुटाला अटक केली आहे. या प्रकरणातील सूत्रधार अन्सारी आणि त्याचे साथीदार कर्जबाजारी झाले होते. या कर्जातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी हा ट्रक लुटला होता अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी या पत्रकार परिषदेत दिली.