ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांना वाघबीळ ग्रामस्थांचा विरोध सहन करावा लागला. वाघबीळ ग्रामस्थांनी भूमिपुत्रांच्या प्रश्नांमध्ये लक्ष न घातल्याबद्दल लोकसभा निवडणुकीत बहिष्कार घालण्याचा इशारा दिला आहे. ग्रामस्थांच्या बैठकीत नुसता बहिष्कारच नाही तर निवडणूक बूथही लावू न देण्याचा इशारा देण्यात आला होता. या गावात राजन विचारे यांची प्रचार फेरी आली असता विचारे यांना ग्रामस्थांचा विरोध सहन करावा लागला. विचारे यांची प्रचार रॅली ग्रामस्थांनी रोखून धरली. यावेळी पोलीसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला पण ग्रामस्थांची पोलीसांबरोबरही बाचाबाची झाली. अखेर ग्रामस्थांचा विरोध पाहून राजन विचारे यांना येथून काढता पाय घ्यावा लागला. ठाण्यातील क्लस्टर योजना, खाडीचे पाणी शुध्दीकरण योजना, वॉटरफ्रंट प्रकल्प, मेट्रो कारशेडचे आरक्षण, कांदळवनाची शेतीमध्ये लागवड, जबरदस्तीनं होणारे जमिनीचं अधिग्रहण अशा अनेक संकटांच्या वेळी लोकप्रतिनिधींनी भूमिपुत्रांकडे लक्ष दिलं नाही. खासदार राजन विचारे यांनी गेल्या ५ वर्षात या प्रश्नासाठी काहीच केलं नाही त्यामुळं ग्रामस्थांचा त्यांना विरोध सहन करावा लागला.