ज्या मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार मोठ्या फरकाने निवडून आले तेथील मतदार शिवसेनेला विरोध का करत आहेत याचा विचार शिवसेनेनं करण्याची गरज आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज व्यक्त केली. नवी मुंबई, मीरा-भाईंदर आणि ठाण्यातही मतदार बहिष्काराच्या भाषा बोलत आहेत. नवी मुंबईत तर तिथल्या जिल्हा प्रमुखांच्या भावानेच बहिष्काराची घोषणा केली आहे असं आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं. ठाण्यातील अनेक मोठमोठ्या कंपन्या बंद पडल्या, या कंपन्यांमधील कामगार बेरोजगार झाले. त्यामुळं त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला. ठाण्यामध्ये १०० एकराच्या वर अनेक बांधकाम व्यावसायिक गृहसंकुलं बांधत आहेत. या गृहसंकुलातील विविध कामं ही कोणाकडे आहेत याची माहिती घ्यावी. ही सर्व कामं सत्ताधा-यांच्या आजूबाजूच्या लोकांच्याच ताब्यात आहेत. त्यामुळं जेव्हा पोटाचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा इतर सर्व प्रश्न बाजूला पडतात असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.