देशात काँग्रेसनं ५६ पक्षांबरोबर महाआघाडी स्थापन केली असून आनंद परांजपे हे महाआघाडीचे उमेदवार म्हणून ठाणे लोकसभा लढवत आहेत. काँग्रेसमध्ये नाराजी असल्याची चर्चा असली तरी अशा कोणत्याही प्रकारची नाराजी नसून कोणत्याही परिस्थितीत ही जागा जिंकणारच असा विश्वास काँग्रेस नेते खासदार हुसेन दलवाई यांनी व्यक्त केला. ठाणे काँग्रेस कार्यालयामध्ये महाआघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांनी हुसेन दलवाई यांची भेट घेतली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. हुसेन दलवाई हे समन्वयक म्हणून काम करणार आहेत. देशाला पेशवाई नको तर शिवशाही हवी आहे. येथील खासदारांनी ५ वर्षात कोणत्याही प्रकारची कामं केलेली नाहीत. त्यामुळं आमचा उमेदवार विजयी होणारच असा विश्वास हुसेन दलवाई यांनी यावेळी व्यक्त केला. काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज शिंदे यांनीही राष्ट्रवादीशी नाराजी नसल्याचं सांगून काही प्रश्न आहेत त्याचं निरसन करण्यासाठी खासदार दलवाई हे समन्वयक म्हणून आले आहेत ते नक्कीच समन्वय साधतील. काँग्रेसमध्ये कोणतेही गटतट नसून आम्ही सर्व एकदिलानं काम करून आघाडीच्या उमेदवाराला विजयी करणार आहोत असा विश्वास मनोज शिंदे यांनी व्यक्त केला.