ठाण्यात १० मे पर्यंत आंबा महोत्सव

संस्कार संस्था, कोकण विकास प्रतिष्ठान आणि कृषी आणि पणन मंडळाच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेल्या आंबा महोत्सवाचं उद्घाटन अभिनेते संतोष जुवेकर यांच्या हस्ते झालं. सुरूवातीस पाच कुमारिकांच्या हस्ते आंब्याचे पूजन करण्यात आले आणि कोकणी पध्दतीनं सिताराम राणे यांनी यावेळी गा-हाणे घातले. येत्या १० मे पर्यंत हा आंबा महोत्सव न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानात सकाळी १० ते रात्री १० पर्यंत सुरू राहणार आहे. या आंबा महोत्सवात यंदा ५० स्टॉल्स असून त्यातील ४० स्टॉल्स हे आंब्याचे आणि उर्वरित स्टॉल्स हे महिला बचत गटांचे असून त्यामध्ये आंबा पोळी, पन्हं, पापड, मिरगुंडं, सांडगी मिरची, कोकम, फणसाचे गरे अशा विविध प्रकारांच्या कोकणातील उत्पादनांची विक्री होणार आहे. यंदा आंब्याचं उत्पादन घटलं असलं तरी आंबा महोत्सवात आंब्याचे दर सर्वसामान्यांना परवडतील असेच असतील असं सांगण्यात आलं. शेतकरी आणि ग्राहक यांचा मेळ घालून कोकणातील शेतक-यांना या महोत्सवाच्या माध्यमातून व्यासपीठ मिळवून देण्यात आलं आहे. या महोत्सवातील आंबा हा गवतात पिकवलेला असल्याचं सांगण्यात आलं. या आंबा महोत्सवाचं यंदाचं हे १४वं वर्ष आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading