मतदार याद्यांमधील घोळ आणि मतदान यंत्रामधील बिघाड यामुळं २० टक्के मतदार मतदानापासून वंचित राहिले आहेत. नागरिकांच्या राष्ट्रीय अधिकारापासून त्यांना वंचित ठेवण्याचं काम निवडणूक आयोगानं केलं असून निवडणूक आयोगाला जाब कोण विचारणार असा प्रश्न आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. मतदार याद्यांमधील गोंधळ सांगताना आव्हाड यांनी हा प्रश्न उपस्थित केला. ओळखपत्र असताना मतदार यादीत नाव नसणं, एकाच इमारतीमधील मतदार घरापासून लांब असलेल्या मतदान केंद्रात असणं, पतीचं नाव एका मतदान केंद्रात तर पत्नीचं नाव दुस-या मतदान केंद्रात असे प्रकार बघायला मिळाले. इतकंच नाही तर आपले वडील दोन वर्षापूर्वी गेले. निवडणूक विभागाला कळवूनही त्यांचं नाव मतदारयादीत असल्याचं आव्हाड यांनी सांगितलं. या प्रकाराला जबाबदार कोण, मतदार याद्यांमध्ये असलेला घोळ निवडणूक आयोगाला अनेक वर्षापासून निस्तरता आला नाही. डीजीटल इंडियाचा डंका पिटणा-या भारतातील मतदार याद्यांमधील गोंधळ गेल्या अनेक वर्षापासूनचा असल्याचं आव्हाड यांनी सांगितलं. सामान्य मतदाराचा मतदानाचा हक्क हिरावून घेणा-या निवडणूक आयोगाला या अपयशाची जबाबदारी घ्यावीच लागेल असं आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं. मतदार याद्यांमधील घोळावर आता तरी तोडगा निघायला हवा. येत्या काळात होऊ घातलेल्या निवडणुकांसाठी मतदारयाद्या बिनचूक तयार करून सर्वांना मतदानाचा अधिकार मिळावा अशी मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.