ठाणे – पालघर जिल्ह्यातील मतदारांनी शिवसेना – भाजप महायुतीवर मोठा विश्वास दाखविल्याने आपले चार खासदार निवडून आले आहेत. मीरा भाईंदर शहरातील नागरिकांनीही शिवसेनेला जवळपास १ लाख ३० हजार मतांची आघाडी शहरातून दिली आहे. त्यामुळे आता आपली जबाबदारी वाढली असून अधिकाधिक विकासकामे शहरात करू अशी ग्वाही ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाईंदर मध्ये बोलताना दिली. ठाण्यातून विक्रमी मतांनी निवडून आलेले खासदार राजन विचारे, कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे, पालघरचे खासदार राजेंद्र गावित, भिवंडीचे खासदार कपिल पाटील या दुसऱ्यांदा विजयी झालेल्या चारही खासदारांचा सत्कार भाईंदरमध्ये आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडून करण्यात आला. चारही खासदारांना निवडून आणण्यासाठी अथक परिश्रम घेणारे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा विशेष नागरी सत्कार यावेळी करण्यात आला. शाल , श्रीफळ , सन्मान पत्र देऊन सरनाईक तसेच चारही खासदारांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. चार खासदार निवडून आणल्यामुळे शिंदे यांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून हा विजय म्हणजे मैलाचा दगड ठरणारा आहे अशा भावना सरनाईक यांनी यावेळी व्यक्त केल्या.एकनाथ शिंदे आपल्या भाषणात म्हणाले की आपले सहकारी , कार्यकर्ते अशा सर्वांच्या मेहनत आणि कष्टाने ठाणे – पालघर जिल्ह्यातील चार खासदार निवडून आले आहेत. यामध्ये सगळ्यांचे योगदान आहे.