कोयणा धरणासाठी आपल्या जमिनी शासनाला देऊन ठाणे जिल्ह्यात विस्थापित झालेल्या कोयना पुनर्वसन करंजवडे गावातील नागरिकांनी तब्बल त्रेपन्न वर्षानंतर पुनर्वसन गावात आपल्या कुलदैवत अंबे मातेचे सुंदर असे मंदिर बांधल आहे. या मंदिराच शानदार उद्घाटन पालकमंत्री एकनाथ शिंदे, यांच्या हस्ते झाल.1953 साली पाटण तालुक्यात कोयना धरण बांधणीच्या हालचाली सुरु झाल्या होत्या. यामुळे या ठिकाणची तब्बल 99 गावे विस्थापित झाली. या मधीलच एक करंजवडे गाव आहे. कोयना धरण बांधल्यावर येथील नागरिकांचे सातारा, पनवेल, ठाणे, रायगड या ठिकाणी सरकारने पुनर्वसन केले. यामध्ये करंजवडे गाव देखील असून ह्या गावातील ग्रामस्थ 1960 ला सातारा जिल्हा सोडून भिवंडी तालुक्यात राहण्याकरिता आले. गावातील ग्रामस्थ आपल्या सोबत कुलदैवतांच्या मुर्ती देखील घेऊन आले होते आणि एक छोटेसे मंदिर या कोयना पुनर्वसन गावी बांधले होते. त्यानंतर इतके वर्षे शासन दरबारी प्रकल्पग्रस्त दाखला, जमीनिकरिता फेर्या मारण्यात ग्रामस्थांचे वर्षे गेले. गावातील ज्येष्ठ ग्रामस्थांनी आपल्या कुलदैवताचे मंदिर बांधण्याचा निर्णय त्यावेळी घेतला होता आणि तब्बल त्रेपन्न वर्षानंतर हा क्षण आला आणि गावातील ग्रामस्थानी सुंदर, भव्य असे अंबे मातेचे मंदिर 2019 या वर्षी उभारले. यामुळे मंदिराचा तीन दिवस शानदार उदघाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या तीन दिवसीय कार्यक्रम प्रसंगी मोठ्या प्रमाणात गावातील ग्रामस्थ तसेच पाहुणे मंडळी उपस्थित होते. या उद्घाटन सोहळ्याचे विशेष परिश्रम अंबाबाई ट्रस्टचे अध्यक्ष तुकाराम कदम, उपाध्यक्ष चंद्रकांत कदम, यांच्यासह सर्व ट्रस्टचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी घेतले.