ठाण्याच्या नळपाडा भागात 10 वर्षीय मुलाचा टाकीत पडून मृत्यू झाल्या प्रकरणात त्याच्या कुटुंबियांना २० लाख रूपयांचं अर्थसहाय्य द्यावं अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष अभिषेक पुसाळकर यांनी केली आहे.
या मृत्यूस महापालिकेची सार्वजनिक बांधकाम यंत्रणाच कारणीभूत आहे. त्यामुळे साहिल जैस्वाल याच्या कुटुंबियांना 20 लाखांचे अर्थसाह्य द्यावे; तसेच, कुटुंबियातील एकाला पालिका सेवेत सामावून घ्यावे अशी मागणी पुसाळकर यांनी केली आहे. येत्या आठ दिवसात याबाबत निर्णय न घेतल्यास पालिका मुख्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. साहिल जैस्वाल हा मुलगा आपल्या घराजवळील टाकीत पडला. ही टाकी 35 फूट खोल असल्याने त्याला बाहेर काढणे शक्य नव्हते. रेस्क्यू व्हॅनद्वारे साहिलला बाहेर काढण्यात आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान या मुलाचा मृत्यू झाला असून निष्काळजीपणामुळे या चिमुरड्याचा जीव गेला असल्याचा आरोप पुसाळकर यांनी आयुक्त आणि महापौरांना दिलेल्या पत्रात केला आहे. ठेकेदारासह अधिकार्यांना लाभ व्हावा, या दृष्टीकोनातूनच या पाण्याच्या टाकीच्या कामाकडे दुर्लक्ष करण्यात आल्यानेच साहीलचा जीव गेला आहे. त्यामुळे या दुर्घटनेची जबाबदारी महापालिका आयुक्तांनी घ्यावी आणि साहिलच्या कुटुंबियांना 20 लाख रुपयांचे अर्थसाह्य करावे तसेच त्यांच्या कुटुंबियांना पालिका सेवेत सहभागी करुन घ्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.