ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये 12 मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. विविध न्यायालयात प्रलंबित प्रकरणे सामंजस्याने सोडविण्याकरिता, दाखल पूर्व प्रकरणे निकाली काढण्यासाठी तसेच दुरावलेले संबंध पुर्नस्थापीत करण्यासाठी राष्ट्रीय लोकअदालतीचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एम. आर. देशपांडे यांनी केले आहे. या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये न्यायालयांमधील प्रलंबित प्रकरणे, तडजोडीस पात्र फौजदारी स्वरूपाची, वैवाहिक स्वरूपाची, 138 एन. आय. अॅक्ट अन्वये दाखल झालेली प्रकरणे, बॅंक वसूली प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, कौटुंबिक वाद प्रकरणे, कामगार विषयक वाद, भूसंपादन प्रकरणे, विज-पाणी विषयक देयक प्रकरणे, महसूली प्रकरणे तसेच दावा दाखल पूर्व प्रकरणे इत्यादी तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. पक्षकारांनी या संधीचा लाभ घेऊन जास्तीत जास्त प्रकरणे लोकअदालतीमध्ये ठेवण्यासाठी अर्ज करावा. तसेच दाखल पूर्व प्रकरणाबाबत ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण किंवा तालुका विधी सेवा समिती यांच्याकडे अर्ज करावा असे आवाहन देशपांडे यांनी केले आहे. राष्ट्रीय लोकअदालतीबाबत कोणतीही समस्या असेल तर 25476441 या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे.