सायकलिंग संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी, तसेच, भारतीय सायकलिंग संघांना देशातच सराव करण्याची संधी देण्यासाठी ‘आत्मनिर्भर भारत’अंतर्गत ‘हिंद अयान’ही वार्षिक बहुस्तरीय सायकलिंग शर्यत आयोजित करण्यात आली आहे. हिंद अयान, पहिली बहुस्तरीय सायकलिंग शर्यत, टूर डी फ्रान्सच्या धर्तीवर, पाच फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय युद्ध स्मारकापासून सुरू झाली. दिल्ली-आग्रा-जयपूर-भिलवाडा-उदयपूर-गांधीनगरमार्गे ती उद्या ठाण्यात पोहचेल. तर, १८ फेब्रुवारीला ठाण्याहून मुंबईला रवाना होईल. ‘हिंद अयान’ हे ५० सायकलपटूंचे पथक आहे. १७ फेब्रुवारी रोजी हे सायकलपटू ठाणे शहरातील शाळा आणि हेरिटेज वास्तूंना भेट देणार आहेत. तर, १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वा. ठाणे महापालिका मुख्यालय येथून ते मुंबई महापालिकेच्या दिशेने रवाना होतील. या टप्प्यात होणाऱ्या जॉय राईडमध्ये ठाणे-मुंबईकरांना सहभागी होता येईल. या शर्यतीचे आयोजक आणि पाच खंडांतील ३५ देशांमधून फिरून संपूर्ण जगाला प्रदक्षिणा करणारे पहिले भारतीय सायकलपटू विष्णुदास चापके यांनी या शर्यतीबद्दल माहिती दिली. सध्या भारतात लांब पल्ल्याच्या सायकलिंगची शर्यत नाही. त्यामुळे ऑलिम्पिक संघ, राष्ट्रीय सायकलिंग संघ, पोलीस आणि सैन्यातील सायकल पटूंना लांब पल्ल्याच्या सायकलिंगमध्ये भाग घेण्यासाठी परदेशात जावे लागते. म्हणूनच, सायकलिंग संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि देशातील सायकलिंग संघांना सराव करण्याची संधी देण्यासाठी, ‘हिंद अयान’ही वार्षिक बहुस्तरीय सायकलिंग शर्यत आयोजित केली आहे. ठाणे ते मुंबई असा प्रवास करून १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी पुण्यात शर्यतीची सांगता होणार आहे.