स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान करणा-या पुस्तकावर देशभरात तात्काळ बंदी घालावी आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केली आहे. सावरकरांच्या अवमानाविरोधात हिंदुत्वनिष्ठांनी निषेध आंदोलन केलं त्यावेळी त्यांनी ही मागणी केली. भोपाळ येथे काँग्रेस सेवादलाच्या प्रशिक्षण शिबीरात वीर सावरकर कितने वीर या नावानं वाटण्यात आलेल्या पुस्तकामध्ये अत्यंत हिनकस आणि धादांत खोटे लिखाण करण्यात आलं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचाच नव्हे तर कोणतेही राष्ट्रपुरूष आणि क्रांतीकारकांचा अवमान होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून तात्काळ कायदा करण्याची आवश्यकता आहे. काँग्रेसचा स्वातंत्र्यवीर सावरकर द्वेष हा संपूर्ण क्रांती विषयक चळवळीचा दोष असून या आक्षेपार्ह पुस्तकावर बंदी घालावी अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या अजय संभूस यांनी केली. आम्ही सारे सावरकर असे लिहिलेले पोस्टर असलेले फलक परिधान करून राष्ट्रप्रेमी या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी आंदोलनकर्त्यांनी भारत माता की जय, वंदे मातरम् अशा घोषणा देत क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरूषांचा अवमान करणा-यांवर कठोर कारवाईची मागणी केली.