ठाणे महापालिकेच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या विविध पर्यावरण पूरक योजनांमुळे ठाणे शहरानं स्मार्ट सिटी क्लायमेटमध्ये देशभरात दुसरा क्रमांक पटकावला आहे. यामुळं ठाणे शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. दिल्लीमधील नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ अर्बन अफेअर्सनं घेतलेल्या स्पर्धेचा निकाल अलिकडेच जाहीर झाला. या स्पर्धेत ठाण्याला दुसरा क्रमांक मिळाला असून पहिला क्रमांक इंदूर शहराला मिळाला आहे. या स्पर्धेत देशातील १०० शहरं सहभागी झाली होती. ठाणे शहराचं विकसित क्षेत्र हे ४६ टक्के आहे तर २५ टक्के हरित क्षेत्र आहे. उर्जा कार्यक्षमता आणि नविनीकरणीय उर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून सौर उर्जेवर चालणारी यंत्रणा पालिकेनं उभारली आहे. यावर अनेक सिग्नल, एलईडी दिवे चालवले जातात. महापालिकेच्या शाळांवर सौरउर्जेवर वीज निर्मिती केली जात आहे. हवेची गुणवत्ता राखण्यातही पालिकेला यश आलं आहे. यासाठी जनजागृती, हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी विविध चौकांमध्ये लावलेली यंत्रणा यातून हवेची गुणवत्ता सुधारली आहे. घनकचरा व्यवस्थापनाच्या विविध योजना पालिकेनं हाती घेतल्या आहेत. या सर्वांची दखल घेत ठाण्याला दुसरा क्रमांक मिळाला आहे.