राज्यातील सर्व सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयातील कामकाजात आवश्यक तेथे बदल आणि गतिमान कामकाज करण्यासाठी योग्य त्या सुधारणा करण्याचं आश्वासन धर्मादाय आयुक्तांनी दिलं आहे. ठाणे जिल्हा सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालयातील गतिमंद कामाबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी आमदार संजय केळकर यांना प्राप्त झाल्या होत्या, त्या अनुषंगाने केळकर यांनी धर्मदाय आयुक्त किरण महाजन यांची भेट घेतली आणि विविध विषयांवर चर्चा केली. त्यावेळी महाजन यांनी हे आश्वासन दिलं. ठाणे सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालयातील काही कर्मचारी अधिकारी, संस्थाचालक मंडळ आणि इतर नोंदणीसाठी येणाऱ्या व्यक्तींचा मानसिक आणि आर्थिक छळ करीत असल्याचे गंभीर आरोप अनेक संस्था तसंच मंडळांचे पदाधिकारी करीत आहेत. चेंजिंग रिपोर्ट साठी अनेक महिने वाट पाहावी लागते, टेलिफोन संपर्क यंत्रणा अनेक महिने बंद ठेवली जात आहे, वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत काही कर्मचारी नागरिकांचा संपर्क होऊ देत नाहीत, या कार्यालयांमध्ये नागरिकांच्या तक्रारीची दखल घेण्यास सक्षम अधिकारी नसल्याची खंत संजय केळकर यांनी यावेळी व्यक्त केली. ठाण्यातील कार्यालयात अपु-या जागेमुळे कर्मचाऱ्यांना काम करता येत नाही. तसेच पालघर – ठाणे जिल्ह्यातून येणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी मंडळे आणि इतर नोंदणीसाठी येणा-या नागरिकांना तासनतास ताटकळत उभे राहावे लागते. सुविधा अभावी त्यांची गैरसोय होत आहे याकडे संजय केळकर यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले त्यासंदर्भात लवकरच तोडगा काढला जाईल. तसेच ज्या अधिकारी – कर्मचा-यांबाबत तक्रारी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे आश्वासनही किरण महाजन यांनी संजय केळकर यांना दिले.