व्हॅट, सेल्स टॅक्स आणि इतर करांच्या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेली अभय योजनेची शेवटची तारीख ३० सप्टेंबर असून सर्व व्यापारी आणि उद्योजकांनी ह्या अभय योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन च्या अध्यक्षा सुजाता सोपारकर
आणि चेंबर ऑफ स्मॉल इंडट्री असोसिएशन्स चे अध्यक्ष श्री संदीप पारीख ह्यांनी केले आहे.
जुलै २०१७ मध्ये जीएसटी लागू होण्याआधी व्हॅट कर आणि विक्रीकराच्या माध्यमातून राज्य सरकारला कर मिळत होता. पेट्रोलियम आणि मद्य सोडून जीएसटी मध्ये बाकी सर्व वस्तू आणि सेवा करामध्ये कर संम्मिलीत झाले आहे. तथापि ज्या व्यापारी, उद्योजकांची व्हॅट, विक्रीकर आणि व्यवसाय कराच्या काळातील विवादित प्रकरणे प्रलंबित राहिली आहेत आणि जे वेळेत कर भरू शकले नाहीत अशी सर्व प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्यासाठी टिसा आणि कोसिआ ने सरकारकडे मागणी केली होती. त्यानुसार महाराष्ट्र सरकारने मार्च २०२२ मध्ये अभय योजना जाहीर केली होती ती योजना ३० सप्टेंबर पर्यंत लागू आहे. ह्या अभय योजनेचा लाभ जास्तीत जास्त व्यापारी आणि उद्योजकांनी घ्यावा म्हणून या संदर्भात ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन आणि चेंबर ऑफ स्मॉल इंडट्री असोसिएशन्सने जिल्ह्यात अनेक ठिकाणी व्यापारी आणि उद्योजकांना मार्गदशन करण्यासाठी अप्पर राज्यकर आयुक्त जी व्ही बिलोलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली अभय योजनेवरती शिबिरांचे आयोजन केल्याने अनेक व्यापारी- उद्योजकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेतला आहे. परंतु असे समजते कि अजूनही अनेक व्यावसायिक, व्यापारी तथा उद्योजक अभय योजनेचा लाभ घेऊ शकलेले नाहीत. त्यांच्यावर भविष्यात पुढे मोठा आर्थिक बोझा पडू शकतो. हे टाळण्यासाठी व्यावसायिक, व्यापारी आणि उद्योजकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आलं आहे.