सरस्वती मंदिर ट्रस्ट सारखी नावाजलेली शिक्षण संस्था नावारूपाला आणणे हे केवळ विमलाबाई कर्वेंच्या सक्षम आणि दूरदृष्टी असलेल्या स्वभावामुळे शक्य – विनय सहस्रबुद्धे

सरस्वती मंदिर ट्रस्ट सारखी संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेली शिक्षण संस्था स्थापन करून नावारूपाला आणणे, हे केवळ विमलाबाई कर्वेंच्या सक्षम आणि दूरदृष्टी असलेल्या स्वभावामुळे शक्य झाल्याचं प्रतिपादन खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी केले. सरस्वती मंदिर ट्रस्ट या शैक्षणिक संस्थेच्या संस्थापिका विमलाबाई कर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औपचारिक उद्घाटन त्यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून झाले त्यावेळी सहस्रबुध्दे बोलत होते. कुठलीही संस्था केवळ एका व्यक्तीमुळे क्रियाशील स्वरुपात शताब्दी साजरी करू शकत नाही. यासाठी स्वयंसेवी कार्यकर्त्यांची फळी निर्माण करावी लागते. अशी फळी बाईनी केवळ निर्माण केली नाही तर आपल्या वर्तनाने आणि कृतीने पुढील पिढीला एक आदर्श घालून दिला आहे. कुठल्याही शैक्षणिक संस्थेचे बळ, हे संस्था चालक यांच्यामधील एकवाक्यतेवर अवलंबून असते असं सांगून शाळेची नूतन इमारत हे कर्वेबाईंचे खरेखुरे जिवंत स्मारक आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. संस्थेचे कार्यकारी विश्वस्त सुरेंद्र दिघे यांनी संस्थेच्या कार्याचा धावता आढावा घेतला. शाळेचे माजी मुख्याधापक आणि माजी कार्यकारी विश्वस्त अशोक टिळक यांनी कर्वे बाईंच्या सहवासात आपले व्यक्तिगत आयुष्य संपन्न झालेच परंतु शाळेच्या उन्नतीसाठी कार्यरत रहाण्याची उर्जा मिळाली असं सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading