सत्ता स्थापनेपेक्षा शेतक-यांचं हित महत्वाचं असल्यामुळे शेतक-यांना मदत मिळावी यासाठी महाआघाडीचे नेते राज्यपालांची भेट घेणार असल्याचं शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. ठाण्याच्या महापौर पदासाठी आज नरेश म्हस्के आणि उपमहापौर पदासाठी पल्लवी कदम यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले त्यानंतर पत्रकारांशी शिंदे बोलत होते. राज्यपालांना भेटून आघाडीचे नेते सत्ता स्थापनेविषयी काही हालचाली करतील अशी अपेक्षा व्यक्त होत होती. मात्र शिंदे यांच्या वक्तव्यामुळे या हालचाली एवढ्या लवकर होणार नसल्याचं दिसत आहे. अवकाळी पावसामुळे शेतक-यांचं मोठं नुकसान झालं असून सत्ता स्थापनेपेक्षा त्यांना आर्थिक मदत मिळणं आवश्यक असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.