शिवसेनेतर्फे पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागातील बाधित नागरिकांना मदत केली जाणार असून ठाण्यातील चरई येथून 2 मोठे कंटेनर तसेच नवी मुंबईतून 7 ट्रक रवाना करण्यात आले. विशेषतः वाई, मेढा, सातारा, पाटण, सांगली, शिरोळ येथील बाधित गावातील नागरिकांना मदत करण्यात येणार आहे. त्यामध्ये जीवनावश्यक अन्नधान्य गृहोपयोगी भांडी, शेगडी, टोप, कुकर, ताट, वाटी, ग्लास, ब्लॅंकेट, चादरी, रजई यांचेही वाटप करण्यात येणार आहे. तसेच त्या ठिकाणी साथीच्या रोगावर नियंत्रण करण्यासाठी आरोग्य पथक आणि ॲम्बुलन्स रवाना करण्यात आली आहे. ठीकठिकाणी शिबिर आयोजित करून नागरिकांची आरोग्य तपासणी करून औषधांचे वाटप केले जाणार आहे. खासदार राजन विचारे आणि उपनेते विजय नाहटा यांच्या पुढाकाराने ठाणे आणि नवी मुंबई येथून संकलित अन्नधान्याच्या एकत्रित गाड्या रवाना करण्यात आल्या.