शिवसेना आणि युवासेनेच्या वतीने वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात सुरू करावा या मागणीसाठी आज स्वाक्षरी मोहिम राबवण्यात आली. ठाणे स्थानकाबाहेर राबवण्यात आलेल्या या मोहिमेला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. एक लाख रोजगार निर्मिती होणारा वेदांता फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प अचानक गुजरातला नेल्याने महाराष्ट्रावर एक प्रकारे अन्याय केल्याचे दिसून आले आहे. आपण पंतप्रधान आहात, सगळ्या देशाचे पालक आहात. तेव्हा एका मुलाला न्याय देताना दुसऱ्या मुलावर अन्याय आपण कसा करू शकता असे पत्रात म्हटले आहे.
गुजरात ढोलेरा येथे मोठी औद्योगिक वसाहत गुजरात सरकार उभारत आहे. तेथे इतरही प्रकल्प आणता येतील पण महाराष्ट्रासाठी मंजूर झालेला हा प्रकल्प गुजरातला पळवल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीने दोन्ही कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रकल्प तळेगाव येथे सुरू करण्याचा निर्णय झाला होता. महाराष्ट्र सरकारने या प्रकल्पासाठी ३९ हजार कोटी सवलत दिली होती. २० वर्षासाठी प्रतिदिन ८० दशलक्ष लिटर पाणी, स्टॅम्प ड्युटीत पाच टक्के सवलत, वीज दरात दहा वर्षासाठी ७.५ टक्के सवलत, तळेगावला ४०० एकर जागा मोफत आणि ७०० एकर जागा ७५ टक्के सवलतीच्या दराने २० वर्षासाठी या कंपनीला १२०० मेगावॅट वीज पुरवठा ३ रुपये युनिट दराने, पाणीपट्टीत ३३७ कोटी आणि घनकच-यात ८१२ कोटीची सवलत जाहीर केली होती. त्यामुळे या कंपनीने महाराष्ट्रात १.५३ लाख कोटीची गुंतवणुकीची तयारी दर्शवली होती. त्यातून राज्यातील किमान एक लाख रोजगार निर्मिती होणार होती. मुख्यमंत्री कार्यालयाकडून देखील हा प्रकल्प महाराष्ट्रातच सुरू होत असल्याचे जाहीर देखील केले होते. राज्याच्या जी डी पी मध्ये देखील या प्रकल्पाने वाढ झाली असती परंतु सगळी मेहनत संपविण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्र पहिल्यापासून औद्योगिक दृष्ट्या अग्रेसर राहिलेल्या आहे वेदांत फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरात सरकारने पळविल्यामुळे महाराष्ट्राच्या तोंडाशी आलेला घास हिसकावून घेतल्याने हजारो तरुण तरुणींचा रोजगार हिरावून घेतल्यामुळे त्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे.यासाठी हा प्रकल्प महाराष्ट्रातच सुरू करावा अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.