शिधावाटप पाणी पुरवठा विभागाच्या इमारती धोकादायक झाल्या असून त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी आमदार संजय केळकर यांनी पुढाकार घेतला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात ठाणे कार्यक्षेत्र असलेल्या शिधावाटप विभागाचे आणि ग्रामीण विभागाचे कार्यालय असून त्याच्या शेजारीच जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाची इमारत आहे. ३६ फ कार्यालयात शहरातील २ लाख ११ हजार ६८ शिधापत्रिका धारक असून ग्रामीण ४१ फ कार्यालयात १ लाख ७४ हजार ७२८ शिधापत्रिका धारक आहेत. या कार्यालयांमध्ये रोज शेकडो लोकांची ये-जा असते. पावसाळ्यात येथे पाणी साचते तर छपरातून पाणी गळतीमुळे कागदपत्रं भिजून मोठे नुकसान होते. कार्यालयामध्ये १००च्या आसपास अधिकारी-कर्मचा-यांचा वावर असतो. या दोन्ही कार्यालयाची आमदार संजय केळकर यांनी पाहणी केली. या दोन्ही इमारतींच्या पुनर्वसनासाठी जिल्हाधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाशी चर्चा करून तातडीनं समस्या सोडवण्याचं आश्वासन आमदार संजय केळकर यांनी दिलं.