ठाणे-कल्याण आणि कल्याण-तळोजा मेट्रो प्रकल्पाचे पुनर्सर्वेक्षण करण्याचे नगरविकास मंत्र्यांचे आदेश

ठाणे-कल्याण आणि कल्याण-तळोजा मेट्रो प्रकल्पाच्या आराखडा बदलासाठी सर्वेक्षण करण्याचे आदेश नगरविकास मंत्र्यांनी दिले आहेत. ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्ग क्रमांक ५ मधील भिवंडी ते कल्याण टप्प्यामधील तसंच कल्याण-तळोजा मार्ग क्रमांक १२ मुळे भिवंडी ते कल्याण टप्प्यात विस्थापितांची संख्या मोठी आहे. कल्याणहून जाणारा मेट्रो मार्ग दुर्गाडीहून थेट एपीएमसीला नेण्याऐवजी बिर्ला महाविद्यालयामार्गे नेण्याची मागणी सुरूवातीपासून आहे. या तक्रारींची दखल घेऊन नगरविकास मंत्र्यांनी हे आदेश दिले आहेत. ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्गापैकी ठाणे ते भिवंडी पट्ट्यातील कामाला सुरूवात झाली आहे. भिवंडी शहरातून जाणा-या मार्गिकेमुळं बाधित होणा-यांचं प्रमाण जास्त आहे. तसंच एक उड्डाणपूलही या मार्गिकेच्या आड येत आहे. त्यामुळं यामध्ये बदल करण्याची मागणी होत आहे. त्याची दखल घेत सर्वेक्षण करण्याचे आदेश नगरविकास मंत्र्यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले. कल्याण पश्चिम भागातून जाणारी मार्गिकाही थेट दुर्गाडी येथून एपीएमसीला नेण्याऐवजी बिर्ला महाविद्यालय परिसर मार्गे नेल्यास कल्याणचा बराचसा भाग मेट्रो मार्गानं जोडला जाईल. त्यामुळं या मार्गिकेतही बदल करण्याची मागणी सुरूवातीपासून होती. हा विचार लक्षात घेत नगरविकास मंत्र्यांनी या मार्गिकेचंही नव्यानं आरेखन करण्याचे निर्देश दिले आहेत. कल्याण-डोंबिवली-तळोजा हा मेट्रोमार्ग फारशी लोकवस्ती नसलेल्या भागातून नेण्यात आला असून अतिवर्दळीचा भाग सोडण्यात आल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळं या मार्गाच्याही आरेखनाबाबत सर्वेक्षण करण्याचे आदेश नगरविकास मंत्र्यांनी दिले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading