कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. मात्र या काळात शाळेतील विद्यार्थी पोषण आहारा पासून वंचित राहू नये यासाठी विद्यार्थ्यांना मिळणारा पोषण आहार योजना सुरू ठेवण्यात आली आहे.
मुख्याध्यापक, शालेय व्यवस्थापन समिती आणि शिक्षक यांच्या साहाय्याने शासकीय नियमांचे काटेकोर पालन करून, सोशल डिस्टन्स ठेवून विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेत बोलावून शिल्लक असणारा आहार नियोजनपूर्वक वाटप करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी संगिता भागवत यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या पाच तालुक्यात १३३१ प्राथमिक शाळा आहेत. या शाळा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बंद आहेत. असे जरी असले तरी विद्यार्थ्यांच्या पोषणाकरीता सुरू असलेली मध्यान्ह भोजन योजना अर्थात पोषण आहार योजना सुरू आहे. ज्या शाळांमध्ये आहार शिल्लक आहे अशा शाळा विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलावून तांदूळ, डाळ, कडधान्य देत आहेत.