कोरोना विषाणूबाबत माध्यमे आणि सोशल मिडीयावर सातत्याने येणारी माहिती आणि त्याचे आकलन यात अंतर पडत असल्याने अनेकांच्या मनात भितीने ताण वाढत आहे. त्यामुळे विविध कारणांमुळे संचारबंदीच्या काळात मदत केंद्र आणि निवारा गृहांमध्ये अडकलेल्या कामगारांचे वैज्ञानिक समुपदेशन करण्यात येणार आहे. तसे निर्देश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत. जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी शेषराव बढे यांच्या नेतृत्वाखाली समुपदेशकांची टीम प्रत्यक्ष या निवारा केंद्रांना भेट देऊन या निवारा केंद्रात असणाऱ्या नागरिकांचे वैज्ञानिक समुपदेशन करण्यात येणार आहे. सातत्याने एकच विषय कानावर पडत असल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण होत आहे. दावे-प्रतिदावे यातून गैरसमज आणि मानसिक ताणही वाढत आहे. त्यामुळे घरापासुन, कुटुंबापासुन दुर असलेल्या अशा व्यक्तींच्या मदतीसाठी ही समुपदेशन सेवा जिल्हा प्रशासनाने सुरु केली आहे. हे मानसोपचार तज्ज्ञ आणि समुपदेशक या लोकांशी संवाद साधतील आणि त्यांच्या मनातील गैरसमज आणि भिती दूर करण्यास मदत करतील.