शाळेची घंटा आणि तिचा नाद हा ब्रह्मांडातील नादाशी नाळ जोडणारा असतो, तसेच शाळेतील घंटेचा नाद आणि मंदिरातील शंखनाद यात समान ताकद असते. विद्यार्थी दशेपासून कुतुहल म्हणून हात लावावीशी वाटणारी घंटा आपल्याच शाळेच्या नव्या वास्तूत दीड वर्षांनी पहिला तास संपल्यावर जेव्हा आपल्या हस्ते वाजली तो क्षण हा आजपर्यतच्या प्रवासातील सर्वोच्च क्षण असल्याचे भाग्य अनुभवले. विद्यार्थी ते ठाणे शहराचा प्रथम नागरिक या वाटचालीत सरस्वती मंदिर या शाळेचा महत्वाचा वाटा असल्याचे उद्गगार सरस्वती शाळेचे माजी विद्यार्थी आणि महापौर नरेश म्हस्के यांनी काढले. सरस्वती विद्या मंदिर या शाळेने आज नव्या वास्तूत प्रवेश केला, या शाळेचे उद्घाटन व कोविड कालावधीनंतर सुरू झालेल्या शाळेच्या वर्गांचा श्रीगणेशा आजपासून करण्यात आला. शाळेचा पहिला तास संपल्यानंतर महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते तास संपल्याची घंटा यावेळी वाजविण्यात आली. शासन निर्देशानुसार आजपासून आठवी ते दहावीच्या शाळा सुरू करण्यात आल्या. दीड वर्ष मुलांची वाट पाहणाऱ्या या शाळांनी आज शाळेचा परिसर दहावीच्या विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून गेला. ठाण्याचे प्रथम नागरिक असलेले नरेश म्हस्के हे सुद्धा सरस्वतीयच, त्यामुळे आज इतक्या वर्षानी शाळेत प्रवेश करताना जुन्या आठवणींना उजाळा मिळालाच परंतु शाळेचे नवे रुप पाहताना मनस्वी आनंद झाला असल्याची प्रतिक्रिया म्हस्के यांनी यावेळी दिली. माझी शाळा या विषयावर निबंध सर्वचजण लिहतात. परंतु माझ्याच शाळेच्या नव्या वास्तूची घंटा तास संपल्यावर शहराचा प्रथम नागरिक या नात्याने वाजविण्याची संधी मिळाली हे माझे भाग्यच आहे. शाळेच्या शिक्षकांनी केलेले संस्कार आणि त्यांनी दिलेली ज्ञानाची शक्ती हीच महापौर पदापर्यंतच्या आयुष्यातील शिदोरी असल्याची प्रतिक्रिया महापौरांनी व्यक्त केली.