शाळा सुरू करण्यावरून टॉस्क फोर्स शिक्षणमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यातच समन्वय नसल्याने सध्या पालक संभ्रमात तर बालक चिंतेत आहेत. अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच, सर्वांनी एकत्रित बसून सरसकट एकच निर्णय जाहीर करावा. जेणेकरून पालकांमधील संभ्रमावस्था दूर होईल.अशी सूचना देखील त्यांनी केली. आमदार संजय केळकर यांच्या संस्कार संस्थेच्या संस्कार स्टडी क्लाऊड या ऑनलाईन शिक्षण सुविधेच्या उपक्रमाचे लोकार्पण करण्यासाठी ठाण्यात आलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी प्रगतीपथावर असलेल्या कोपरी पुलाचीही पाहणी केली. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. कोरोनामुळे सर्वात जास्त परिणाम शिक्षणावर झाला.जवळजवळ पावणेदोन वर्षे शाळा बंद आहेत. तरी सरकारचे भलतेच सुरु आहे. १० वी,१२ वी चा निकाल असो परिक्षा असो वा प्रवेश असो प्रत्येकवेळी सरकारकडुन मोठा घोळ घातला जातो. मंत्री सांगतात १७ ऑगस्टला शाळा सुरु तर मुख्यमंत्री सांगतात टास्क फोर्सने मनाई केली आहे. कुठला समन्वय नाही, कुणाचा पायपोस कुणाला नाही.त्यामुळे पालक संभ्रमात तर बालक चिंतेत आहेत. अशी टीका फडणवीस यांनी केली. कोपरी पुलाच्या रुंदीकरणाचे काम सुरु असून या पुलाची पाहणी करून फडणवीस यांनी पुलाच्या कामांबाबत समाधान व्यक्त केले. हा पूल आठ मार्गिकांचा होणार असल्याने वाहतूक कोंडी फुटणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोपरी पुलाचे काम आमचे सरकार आल्यानंतर सुरू झाले. ठाणेकरांची मागणी लक्षात घेऊन हे काम आता पूर्ण होत आहे. याबाबत ज्या काही तक्रारी आल्या होत्या त्या दूर झालेल्या आहेत, तरीसुद्धा यातील आणखीन काही त्रुटी असतील तर त्या दूर केल्या जातील आणि हा पूल ठाणेकरांसाठी भविष्यात निश्चितच लाभदायक ठरेल त्यांनी सांगितले. लवकरच या पुलाचे काम पूर्ण होऊन तो वाहतुकीसाठी खुला होईल असेही त्यांनी सांगितले. १९६५ साली उभारण्यात आलेला कोपरी पूल चार पदरी आणि पुर्वद्रुतगती महामार्ग आठपदरी असल्यामुळे याठिकाणी वाहतूक कोंडी होत होती. राज्य सरकारने या पुलासाठी ९ कोटी मंजूर केले मात्र १० वर्ष फाईल धूळखात पडली. दरम्यानच्या काळात २०१३ साली आमदार संजय केळकर यांनी पाठपुरावा सुरु केला.मात्र पुलाच्या कामाचा खर्च वाढल्याने त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले. फडणवीस यांनी तत्काळ मंजुरी देवून संबधित खात्यातून २९५ कोटी मंजूर करून दिले.आ. केळकर यांनी एमएमआरडीए आयुक्त युपीएस मदान यांच्याकडे पाठपुरावा सुरुच ठेवला. अखेर नोव्हे. २०१८ साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते कोपरी पुलाच्या कामाचे भूमिपूजन झाले.