राज्य सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तू विक्री करणाऱ्या दुकानांच्या वेळा सहायक आयुक्तांकडून निश्चित केल्या जाणार आहेत. मात्र, त्यात व्यापाऱ्यांवर सक्ती न करता स्थानिक व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून निर्णय घ्यावा अशी मागणी गटनेते मनोहर डुंबरे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने मार्गदर्शक तत्वे निश्चित केली आहेत. त्यानुसार दुकान, भाजीपाला दुकान, फळविक्रेते, दुधदुकाने, बेकऱ्या, खाद्यपदार्थ दुकाने आदी दाट लोकवस्तीच्या ठिकाणी आहेत का किंवा दुकानांमध्ये गर्दी होत आहे का, याबद्दल सहायक आयुक्तांना वेळोवेळी अभ्यास करण्याची सुचना केली आहे. त्याचबरोबर दुकानांच्या वेळा बदलणे तसेच दुकानांच्या वेळा निर्धारित करुन देणे आवश्यक आहे. खुल्या मैदानांच्या जागा, मोकळ्या जागा निर्धारित करून काही दुकाने हलवणे शक्य आहे का, तात्पुरत्या स्वरुपाची दुकाने सुरू करता येतील का, ते पाहणे आवश्यक असल्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने कोविड पसरण्यास कारणीभूत ठरत असतील, तर सहायक आयुक्तांना काही दुकाने बंद करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आणि व्यापाऱ्यांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेने कोणताही निर्णय घेताना स्थानिक व्यापारी संघटनांबरोबर चर्चा करावी. त्यानंतरच निर्णय घ्यावा अशी मागणी मनोहर डुंबरे यांनी केली आहे.