ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये सुरू असलेल्या हर हर महादेव या मराठी चित्रपटाचा काल रात्रीचा शो आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बंद पाडला. यावेळी एका प्रेक्षकानं तिकिटाचे पैसे मागितल्यावरून झालेल्या वादात त्याला मारहाण करण्यात आली. पोलीसांनी याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यासह १०० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तर चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी चित्रपट न पाहताच विरोध केला जात असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हर हर महादेव या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचे दाखवण्यात आल्याच्या विरोधात आव्हाड यांनी प्रेक्षागृहात जाऊन छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत चित्रपटाचा शो बंद पाडला. यावेळी त्यांनी प्रेक्षकांना विनंती करून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र एका प्रेक्षकाने तिकिटाचे पैसे परत मागितले त्यावेळी मारहाणीचा प्रकार घडला. चुकीच्या पध्दतीने इतिहास दाखवला जात असल्याचा आरोप यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी केला. बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेली विकृत परंपरा आता चित्रपटांच्या माध्यमातून पुढे येत असल्याचं त्यांनी सांगितलं. ही विकृती आम्ही खपवून घेणार नाही आणि हा चित्रपट राज्यात कुठेही चालू देणार नाही असंही ते म्हणाले. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं चित्रपट बंद पाडण्याला विरोध दर्शवला आहे. यावरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस समोरासमोर आले आहेत.