विविध बँकांच्या एटीएम सेंटरमध्ये महिला आणि वयोवृध्द नागरिकांना मदत करण्याच्या बहाण्याने त्यांची फसवणूक करणा-या आंतरजिल्हा टोळीस खंडणी विरोधी पथकानं अटक केली आहे. तसंच त्यांच्याकडून विविध बँकांची १०१ एटीएम कार्ड जप्त करून ८ गुन्हे उघडकीस आणले आहेत. रूपाली बोचरे या भिवंडीत राहणा-या महिला खाजगी कंपनीत नोकरी करतात. त्यांचे स्टेट बँकेत खाते असून त्यांना ५० हजार रूपये नातेवाईकांना पाठवायचे होते. त्यासाठी त्या पैसे भरण्यासाठी एटीएम सेंटरमध्ये गेल्या होत्या. तिथे त्यांना एका व्यक्तीने मदत करण्याचा बहाणा करत त्यांच्याकडील एटीएम कार्ड हातचलाखीने घेत त्याची अदलाबदल केली. आणि त्यांना दुस-या व्यक्तीचे एटीएम कार्ड दिले. त्यानंतर रूपाली बोचरे या निघून गेल्यानंतर या आरोपीने त्यांचे एटीएम कार्ड वापरून त्यांच्या खात्यातून ३८ हजार रूपये काढून या महिलेची फसवणूक केली. याबाबत खंडणी विरोधी पथकाला माहिती मिळताच या पथकाने पंढरपूर येथे जाऊन तेथील बँकेच्या कर्मचा-यांच्या मदतीने सनी चकना, श्रीकांत गोडबोले, हरीदास मगरे आणि रामराव शेंडफड यांना ताब्यात घेतले. या चार जणांची चौकशी केली असता त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी आणखीही असे गुन्हे केल्याचं उघडकीस आलं आहे. पोलीसांनी त्यांच्याकडून १०१ एटीएम कार्ड हस्तगत केली तसंच लोकांची फसवणूक करून मिळवलेले ७० हजार रूपये आणि इतर वस्तू असा एकूण ४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.