विविध उपाययोजनांमुळे लवकरच ठाण्याची वाहतुकीच्या विळख्यातून मुक्तता – खासदार विनय सहस्रबुध्दे यांचा दावा

ठाण्याला वाहतुकीच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असल्याचा दावा खासदार विनय सहस्रबुध्दे यांनी केला. या उपाययोजनांची माहिती देण्यासाठी आयोजित एका पत्रकार परिषदेत त्यांनी हा दावा केला. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टमधून होणा-या वाहतुकीचा वेग आणि प्रमाण याचा परिणाम शहरातील वाहतुकीवर होत आला आहे. यातून सुटका व्हावी म्हणून रेल्वे, जहाज बांधणी नौकानयन आणि वाणिज्य या तीन खात्यांशी समन्वय साधून उपाययोजना करण्यात आल्यामुळे त्याचा फायदा शहरातील वाहतुकीला होणार असल्याचं विनय सहस्रबुध्दे यांनी सांगितलं. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टमधील मालाची चढउतार करण्यासाठी आकारल्या जाणा-या शुल्कामध्ये किफायतशीरपणा आणल्यामुळे त्याचा फायदा माल वाहतूकदारांना होणार आहे. त्याचप्रमाणे मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये काही तांत्रिक अडचणींमुळे बाहेरून येणारा माल ठेवता येत नसल्यानं तो भिवंडीत ठेवला जात होता. पण आता मुंबई पोर्ट ट्रस्टमधील ही अडचण दूर करून हा माल तिथेच ठेवला जाणार आहे. यासाठी लवकरच निविदा काढल्या जाणार असून येत्या ३-४ महिन्यात शहरातील वाहतुकीवरील ताण कमी झालेला जाणवेल असा दावा विनय सहस्रबुध्दे यांनी यावेळी केला. रोरो सेवेबाबतच्या मागणीलाही रेल्वेनं मान्यता दिल्यामुळे वसई रोड आणि भिवंडी येथून लवकरच जेएनपीटी पर्यंत ही सेवा सुरू होणार आहे. वाहतूकदारांनी वाहतुकीसाठी प्राधान्यानं रेल्वेचा पर्याय निवडावा म्हणून गुजरात आणि महाराष्ट्रातील व्यावसायिकांशी लवकरच संवाद साधला जाणार आहे. यासाठी वाणिज्य विभागातील सचिव एन. शिवशैलम् ठाण्यामध्ये सर्व संबंधित विभागाच्या अधिका-यांची एक बैठक घेणार असल्याचंही विनय सहस्रबुध्दे यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading