नागरिकांना त्यांच्या नागरी समस्या थेट महापौर अथवा प्रशासनातील अधिका-यांना भेटून मांडता याव्यात आणि त्याचे निराकरण तत्परतेनं होऊन त्यांना न्याय मिळावा यासाठी दर महिन्याच्या तिस-या सोमवारी महापौर जनसंवाद हा उपक्रम राबवला जाणार आहे. त्यानुसार येत्या सोमवारी २० जानेवारीला महापालिकेत सकाळी ११ वाजता महापौर जनसंवादचं आयोजन करण्यात आलं आहे. बहुतांश वेळा नागरिकांना वरिष्ठ अधिका-यांची भेट घेणं शक्य नसतं किंवा आपलं म्हणणं स्पष्ट मांडता येत नसल्यानं समस्या प्रलंबित राहतात. महापालिका क्षेत्रातील नागरी समस्या तातडीनं सोडवता याव्यात यासाठी महापौर जनसंवाद हा उपक्रम राबवला जात आहे. या जनसंवादा दरम्यान महापालिकेचे पदाधिकारी, अधिकारी उपस्थित राहून त्यांच्या तक्रारी ऐकतील आणि त्यांचं निराकरण करतील. प्रत्येक महिन्याच्या तिस-या सोमवारी हा उपक्रम राबवला जाणार असून त्या दिवशी सुट्टी आल्यास दुस-या दिवशी हा उपक्रम राबवला जाईल असं महापौरांनी सांगितलं. नागरिकांनी महापौर जनसंवाद या कार्यक्रमास येताना आपल्या तक्रारी लेखी स्वरूपात आणाव्यात असं आवाहन महापौरांनी केलं आहे.