नागरिकांना नागरी सुविधा पुरविण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून अनेक विकासकामे केली जात आहे. या कामांचा दर्जा सर्वोत्तम असणे आवश्यक असून त्यामध्ये कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी त्रयस्थ संस्थेकडून तांत्रिक लेखापरिक्षण करण्यात येईल असे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी निर्देश दिले आहेत. प्रशासकीय निधीअंतर्गत होणाऱ्या 3 कोटीपर्यंतच्या कामाचे त्रयस्थ तांत्रिक लेखापरीक्षण घेण्याची जबाबदारी शासनाने प्रसिद्ध केलेल्या निर्णयामध्ये नमूद केली आहे. मात्र शासनाने नमूद केलेल्या कामापुरते मर्यादित न राहता इतर सर्व प्रशासकीय निधीतील कामांचे महापालिकेने हाती घेतलेल्या मोठ्या कामांचे देखील त्रयस्थ संस्थेकडून तांत्रिक लेखापरिक्षण करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. महापालिकेमार्फत मोठ्या प्रमाणात कामे सुरू असून त्यांचा दर्जा चांगला रहावा यासाठी महापालिकेने दक्ष राहणे आवश्यक आहे मात्र पर्यवेक्षीय दुर्लक्ष किंवा अप्रमाणिक हेतू या माध्यमातून कामाचा दर्जा कमी होत असेल तर संबंधित कार्यकारी अभियंता आणि विभागप्रमुख यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात येईल तसेच महापालिकेच्या माध्यमातून होणाऱ्या इतर कामांचे देखील त्रयस्थ संस्थेकडून तांत्रिक लेखापरिक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तसेच तांत्रिक लेखापरीक्षण न केल्यास संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असेही त्यांनी नमूद केले आहे.महापालिकेच्या तालिकेवरील मंजूर निविदेअंतर्गत करण्यात आलेल्या त्रयस्थ तांत्रिक लेखापरिक्षण सल्लागार संस्थांमार्फत कार्यवाही करावी असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि अन्य शासकीय विभागांमार्फत प्राप्त होणा-या निधीअंतर्गत १ कोटी आणि त्यावरील अंदाजखर्चाच्या सर्व कामांचे देयक निहाय त्रयस्थ तांत्रिक लेखापरिक्षण हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, वीर जिजामाता टेक्निकल इन्स्टिट्यूट, कॉलेज ऑफ इंजिनीअरींग, पुणे या संस्थांमार्फत करणेबाबतची कार्यवाही करण्याबाबत आयुक्तांनी सांगितले.
तांत्रिक लेखापरिक्षण च्या माध्यमातून त्या संबंधित कामाचा दर्जा उत्तम राखण्यात मदत तर होईलच, तसेच सर्व मोठ्या कामांचे त्रयस्थ तांत्रिक लेखापरीक्षण केल्यामुळे जो संस्थात्मक बदल होईल त्यातून कामकाजामध्ये दुर्लक्ष किंवा अप्रमाणिक हेतूने कामाचा दर्जा कमी ठेवण्याच्या प्रवृत्तीला आळा बसेल असेही आयुक्त अभिजीत बांगर यांनी नमूद केले.