ठाण्यातील अनेक रस्त्यांवर असलेल्या वाहतूक शाखेच्या चौक्यांचा उपयोग अन्य कारणासाठीच होत असून या वाहतूक चौक्या हटवण्याच्या मागणीस वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. ठाण्यातील एक जागरूक नागरिक महेंद्र मोने यांनी वाहतूक शाखेच्या उपायुक्तांकडे रस्त्यावरील या वाहतूक चौक्यांबाबत तक्रार केली होती. ही तक्रार त्यांनी ३ ऑगस्टला केली होती. त्यावर १४ सप्टेंबरला मोने यांना बोलवून समज देण्यात आली आणि वापरात नसलेल्या वाहतूक पोलीसांच्या चौक्या लवकरात लवकर हटवण्यात येतील असं सांगण्यात आलं. मात्र त्यास महिन्यापेक्षा अधिक काळ उलटूनही काहीच कार्यवाही झालेली नाही. निवडणुकीच्या काळात राजकीय पक्षांनी या चौक्यांचा वापर नेत्यांचे फलक लावण्यासाठी केला होता. त्याबाबत मोने यांनी तक्रार केल्यानंतर केवळ ते फलक हटवण्यात आले. पण संबंधितांवर कोणतीही कारवाई झाली नाही. नुसतेच कायदे कडक करून उपयोग नाही तर त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असलेल्या अधिका-यांनीही अशा तक्रारींवर कारवाई करण्यामध्ये कुचराई करणं निराशाजनक असल्याचं मोने यांनी म्हटलं आहे.