लोकांची जी इच्छा आहे ती शरद पवारांनी पूर्ण करावी – जितेंद्र आव्हाड

शरद पवार ही महाराष्ट्राची गरज आहे. शरद पवार हे सक्रीय राजकारणातून बाजूला होणे म्हणजे महाराष्ट्राचे मोठे नुकसान आहे. सध्या राज्य संस्कृतीहीन झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे सांस्कृतिक, आर्थिक, उद्योग, राजकीय या सर्वच क्षेत्रात नुकसान होत आहे. हे नुकसान थांबविण्यासाठी शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घ्यावा अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केली. शहराध्यक्ष तथा ठाणे-पालघर जिल्हा समन्वयक आनंद परांजपे, महिलाध्यक्षा सुजाता घाग, युवक अध्यक्ष विक्रम खामकर, युवती अध्यक्षा पल्लवी जगताप यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे प्रदेश कार्यकारिणीकडे पाठविले आहेत. लोक माझे सांगाती या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्यात शरद पवार यांनी आपल्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. त्याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटू लागले असून जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रीय सरचिटणीसपदाचा आणि इतर पदाधिकाऱ्यांनी आपापल्या पदांचे राजीनामे दिले. यावेळी पत्रकारांशी बोलताना आव्हाड पुन्हा भावूक झाले. सध्या राज्यात वादळ घोंघावत आहे. या घोंघावणाऱ्या वादळाशी लढण्यासाठी शरद पवार हे नाव पाठीशी असलेच पाहिजे. कुठलीही भूमिका घेताना ज्या बाजूने लोकहीत आहे त्याच बाजूने निर्णय झाला पाहिजे. कदाचित तो आपल्या मनाला पटला नाही तरी चालेल. पण लोकशाहीच्या विरोधात कुठलाही निर्णय जाता कामा नये असे शरद पवार हेच आपणाला सांगत आले आहेत. आज कोणाचाही विचार न करता त्यांनी राजीनामा देऊन आम्हांला वाऱ्यावर सोडले आहे. या सगळ्या वादळ वाऱ्यांना आम्ही गेली अनेक वर्षे तोंड देत आहोत ते केवळ एकच शरद पवार या शब्दामुळे. शरद पवार हे महाराष्ट्रातील राजकीय-सामाजिक चळवळीतील भीष्म पितामह आहेत. त्यांच्यातील ऊर्जा आम्हास बळ देत आहे. आमचे सर्वांचे जीवन पवारांशी जोडले गेलेले आहे. म्हणूनच आम्ही आजही सांगत आहोत की, शरद पवार यांना राजीनामा देण्याचा अधिकार कोणी दिला? त्यांना राजीनामा परत घ्यावाच लागेल असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading