लॉकडाऊनच्या काळात रिक्षाचालकांच्या खात्यात १५०० रुपये जमा करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा केवळ फार्स ठरली आहे. १३ एप्रिल रोजी मदतीची घोषणा झाली असली तरी प्रत्यक्ष मदत मिळण्यास जून उजाडणार आहे याकडे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आणि रिक्षाचालक-मालक संघटनेचे अध्यक्ष संजय वाघुले यांनी लक्ष वेधले आहे. लॉकडाऊनच्या काळातच पैशांची गरज असताना केवळ घोषणा करून राज्य सरकारने फसवणूक केली आहे, असा आरोप वाघुले यांनी केला आहे.
राज्यात लॉकडाऊन जाहीर करताना मुख्यमंत्र्यांनी रिक्षाचालकांच्या खात्यात १५०० रुपये जमा करण्याची घोषणा केली होती. मुंबई-ठाणे जिल्ह्यात सुमारे तीन लाखांहून अधिक परमिटधारक रिक्षाचालक आहेत. १ एप्रिलपासून राज्य सरकारचे निर्बंध आणि १५ एप्रिलपासून लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर लवकर मदत मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, आतापर्यंत एक रुपयाही मिळालेला नाही. सध्या आरटीओकडून रिक्षाचालकांचे बॅंकेतील खाते क्रमांक आधार कार्डला लिंक करण्याचे काम सुरू आहे. संबंधित काम पूर्ण होण्यास जून उजाडणार आहे. त्यानंतरच रिक्षाचालकांच्या खात्यात मदत मिळणार असल्याची अपेक्षा आहे, याकडे संजय वाघुले यांनी लक्ष वेधले आहे.