राज्य शासकीय कार्यालयातील लिपिक-टंकलेखक संवर्गातील सर्व पदे राज्य लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा निर्णय लाखो विद्यार्थ्यांच्या हिताचा आहे अशी प्रतिक्रिया आमदार निरंजन डावखरे यांनी व्यक्त केली आहे. यापूर्वी राज्यातील सर्व विभागांमध्ये लिपिक-टंकलेखक संवर्गातील पदांसाठी स्वतंत्रपणे परीक्षा घेतली जात होती. प्रत्येक विभागातील लिपिक संवर्गातील परीक्षेसाठी वेगळी जाहिरात, स्वतंत्र परीक्षा आणि निकालांमध्ये बराच अवधी जात होता. त्याचबरोबर या परीक्षांसाठी वेगवेगळे शुल्क विद्यार्थ्यांना भरावे लागत होते. त्यामुळे सर्व विभागांच्या लिपिक-टंकलेखक संवर्गातील परीक्षा `एमपीएससी’मार्फत घ्याव्यात अशी मागणी डावखरे यांनी केली होती. या संदर्भात प्रशासकीय यंत्रणेकडे पाठपुरावा केला जात होता. त्यानंतर या परीक्षा ‘एमपीएससी’द्वारे घेण्याचा विचार सुरू असल्याचे पत्र राज्याचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी डावखरे यांना पाठविले होते. त्याचबरोबर सरळसेवा पदभरतीच्या प्रचलित कार्यपद्धती ४ मे २०२२ रोजी निश्चित झाली आहे. त्यानुसार आगामी भरती केली जाणार असल्याचे पत्रात स्पष्ट केले होते. अखेर काल सामान्य प्रशासन विभागाने लिपिक पदाची भरती राज्य लोकसेवा आयोगामार्फत होणार असल्याचे जाहीर केले.