कल्याण-डोंबिवलीसह ग्रामीण भागाला थेट मुंबई, नवी मुंबई आणि तळोजाशी जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी कल्याण – तजोळा या मेट्रो १२ प्रकल्पाला गती मिळाली आहे. कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी या प्रकल्पाचे काम वेगाने हाती घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार एमएमआरडीएच्या माध्यमातून या प्रकल्पाचे तातडीने सर्वेक्षण सुरू करण्यात आले होते. हे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात असून येत्या काही दिवसात हे सर्वेक्षण पूर्ण होईल आणि त्यापुढील कामांना लवकरच सुरूवात होईल अशी माहिती श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. कल्याण-डोंबिवली ही शहरे मेट्रो मार्गाने जोडून त्यांना वाहतुकीची नवी साधने उपलब्ध करून देण्याच्या हेतूने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून विविध मेट्रो मार्गांची उभारणी केली जात आहे. या मार्गांमुळे लवकरच या भागातील प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे. ठाणे – भिवंडी – कल्याण या मेट्रो मार्गाचा विस्तारीत भाग असलेल्या कल्याण – डोंबिवली – तळोजा या मार्गाकडे महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून पाहिले जाते. या मेट्रो मार्गामुळे मुंबई, उपनगरातून ठाण्यात येणारा प्रवासी आणि ठाणे शहरातला प्रवासी भिवंडी, कल्याण आणि थेट तळोजा तसेच नवी मुंबईला जोडला जाणार आहे. त्यामुळे मुंबई ते ठाणे आणि ठाणे ते कल्याण तसेच थेट नवी मुंबई असा सलग प्रवास विनासायास करता येणारआहे. या प्रकल्पाला गती मिळाल्याने कल्याण तळोजा ही महत्वाकांक्षी मेट्रो लवकरच प्रत्यक्षात उतरणार असल्याची आशा खासदार शिंदे यांनी व्यक्त केली आहे. कल्याण तळोजा ही मेट्रो मार्गिका ठाणे – भिवंडी – कल्याण या मेट्रो मार्गिकेला जोडली जाणार आहे. हा मार्ग एकूण २० किलोमीटर लांबीचा असून यात १७ मेट्रो स्थानके असणार आहेत. कल्याण पश्चिमेतील कृषी उत्पन्न बाजार समितीपासूनहा मार्ग सुरू होणार आहे. तर पुढे डोंबिवलीतील विविध गावे आणि मानपाडा मार्गे कल्याणच्या ग्रामीणभागातून हा मेट्रो मार्ग जाणार आहे. या मार्गामुळे शहरी भागासह ग्रामीण भागही मेट्रोला जोडला जाणार आहे.