एकीकडे सारे जग कोरोनाविरूद्ध लढ्यात गुंतलेले असताना सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. अशा वेळी रोटरीसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थेने टिटवाळ्याजवळ दोन बंधारे बांधून अंखर ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीतील म्हस्कळ गावात ही योजना राबवली आणि गावकर्यांच्या पाण्याचा प्रश्न सोडवला.रोटरी क्लब ऑफ ठाणे मिडटाऊनने इंग्लंडमधील वॉलसॉल रोटरी क्लबच्या सहाय्याने हा बंधारे प्रकल्प राबवला. यामुळे सुमारे एक कोटी लिटर अडवले जाणार आहे. त्यामुळे परिसरातील भूगर्भ पाण्याची पातळी वाढणार आहे. जमिनीत पाणी झिरपल्यामुळे गावकर्यांना भाजीपाला लागवड करण्यास हातभार लागणार आहे. विशेष म्हणजे पहिल्या पावसात ही धरणे वाहू लागली होती. अलिकडेच या दोन धरणांचे ऑफलाईन उद्घाटन रोटरीचे प्रांतपाल संदीप कदम यांच्या हस्ते झाले. म्हस्कळ गावातील रहिवाशांनी या योजनेचे स्वागत केले असून रोटरी क्लब ऑफ ठाणे मिडटाऊन आणि कल्याण रिव्हरसाईड क्लबचे आभार मानले आहेत. रोटरी क्लब ऑफ वॉलसॉलचे अध्यक्ष आणि मूळचे ठाणेकर असणारे डॉ. मुकूंदा चिद्रवार, बिर्ला इस्टेटचे सर्व अधिकारी यांनी मोलाचे योगदान दिले.