राष्ट्रवादी काँग्रेसचा २३ वा वर्धापन दिन ठाणे पक्ष कार्यालयात ठाणे, पालघर जिल्हा समन्वयक तथा ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि ठाणे, पालघर महिलाध्यक्षा ऋताताई आव्हाड यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची संख्या २३ ने वाढवून ५९ वर नेण्याचा निर्धार शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचा आज २३ वा वर्धापन दिन ठाणे पक्ष कार्यालयात शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. केवळ वर्धापन दिन साजरा करून थांबायचे नाही. तर आगामी निवडणूक ताकदीने लढवायची आहे. महविकास आघाडीचा निर्णय जितेंद्र आव्हाड हे घेणार आहेत. पण, महाविकास आघाडीच्या भरवश्यावर आपण आपले काम थांबवायचे नाही. आपण सर्वांनी प्रभागनिहाय पक्ष वाढीसाठी संघर्षरत रहायचे आहे. महाविकास आघाडी झाली तर स्वागतच आहे. तरीही आपण सर्वांनी प्रत्येक प्रभागात जोरदार काम करायचे आहे. त्यासाठी पुढील आठवड्यापासून नवीन प्रभाग रचनेनुसार व्यूहरचना आखण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने २३ वा वर्धापन दिन साजरा केला असल्याने आता आपण २३ नगरसेवक वाढविण्यासाठी काम करायचे आहे, असे आनंद परांजपे यांनी सांगितले.