राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या दीडशेव्या जयंती निमित्तानं उद्या स्वच्छ भारत हा दिवस साजरा करण्यात येणार आहे. या दिवसाचं औचित्य साधत स्वच्छता ही सेवा या अभियानांतर्गत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्लास्टीक कचरा गोळा करण्यासाठी महाश्रमदान करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांच्या हस्ते लोनाड ग्रामपंचायतीत होणार आहे. या कार्यक्रमादरम्यान लोनाड येथील शाळेत सॅनिटरी नॅपकीन डिस्पोझल मशिन बसवण्यात येणार आहे. तसंच प्लास्टीक बंदी व्हावी यासाठी कापडी पिशव्यांचं वाटप करण्यात येणार आहे. तसंच शाळेतील मुलांची स्वच्छता दिंडीही काढण्यात येणार आहे. हा उपक्रम जिल्ह्यातील कल्याण, अंबरनाथ, मुरबाड, भिवंडी आणि शहापूर या पाचही तालुक्यातील ग्रामपंचायत स्तरावर होणार आहे.