येत्या शुक्रवारी ठाणेकरांची सावलीही अदृश्य होणार आहे. येत्या शुक्रवारी म्हणजे १७ मे रोजी १२ वाजून ३५ मिनिटांनी आपली सावलीही अदृश्य झाल्याचा अनुभव ठाणेकरांना घेता येईल अशी माहिती खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली आहे. उत्तर गोलार्धातील कर्कवृत्त आणि दक्षिण गोलार्धातील मकरवृत्त यामधील प्रदेशातच सूर्य आकाशात बरोबर डोक्यावर आल्यानं वर्षातून दोन वेळा शून्य सावलीचा अनुभव घेता येतो. आपण राहत असलेल्या स्थळाचे अक्षांश आणि सूर्याची क्रांती ज्यादिवशी सारखी होते त्याच दिवशी दुपारी मध्यान्हाला सूर्य आकाशात ठीक डोक्यावर येतो. ठाणे, बोरिवली, डोंबिवली आणि कल्याणकरांना शुक्रवार १७ मे रोजी दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी शून्य सावलीचा अनुभव घेता येईल असंही दा. कृ. सोमण यांनी सांगितलं.