ठाणे तालुक्यातील ८ नवीन गेटेड सिमेंट काँक्रीट बंधाऱ्यांचे आणि येऊर येथील हुमायून बंधारा दुरुस्ती करण्याचे काम जलसंधारण विभागाने मंजूर केले आहे. येऊर येथे जुन्या हुमायून बंधाऱ्याची दुरुस्ती करून आणखी नवीन ५ बंधारे बांधले जाणार आहेत. शहरी भागात अशाप्रकारे जलसंधारण करण्यासाठी बंधारे बांधण्याचा हा पहिला प्रयोग आहे. येऊर येथे बांधल्या जाणाऱ्या बंधाऱ्यातून ठाण्याला ३ दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होणार आहे अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली. येऊर येथे धबधबा असून पावसात हे सगळं पाणी वाहून जाते. हे वाया जाणारे पाणी वापरात यावे यासाठी येथे बंधारे बांधण्याची मागणी आमदार सरनाईक यांनी केली होती. गेल्या वर्षी झालेल्या हिवाळी अधिवेशनात आमदार प्रताप सरनाईक यांनी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांची भेट घेऊन त्यांना याबाबत निवेदन दिले होते. त्यावेळी मंत्र्यांनी याबाबत जलसंधारण विभागाला सर्वे करण्याचे आदेश दिले होते. तसेच याबाबत फेब्रुवारी महिन्यात मंत्री गडाख यांच्यासोबत सरनाईक आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठकही झाली होती. येऊर येथे दरवर्षी पावसात पाणी वाहून जाते. येऊर येथे स्थानिक नाल्यावर नवीन ५ सिमेंट काँक्रीट बंधाऱ्यांचे बांधकाम केले जाणार आहे. येऊर येथे बंधारे बांधकाम केल्याने साधारण ३ दशलक्ष लिटर पाणी त्यातून उपलब्ध होणार आहे. चेना नदी आणि येऊर येथे हे बंधारे बांधण्यासाठी ९ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हे बंधारे बांधल्यामुळे वन्यप्राण्यांनाही जंगलातच वर्षभर पाणी मिळणार आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांना रस्त्यावर यावे लागणार नाही असं आमदार सरनाईक यांनी सांगितले.