मोखाडाच्या १८ तरुणांना आमदार संजय केळकर यांनी मिळवून दिला न्याय

मध्य वैतरणा प्रकल्पात बाधित मोखाडा तालुक्यातील कारेगावच्या कुटुंबांना अखेर आमदार संजय केळकर यांच्या माध्यमातून न्याय मिळाला आहे. या कुटुंबातील १८ तरुण मुंबई महापालिकेच्या सेवेत रुजू झाले आहेत. २००५मध्ये मध्य वैतरणा धरण प्रकल्पासाठी मोखाडा तालुक्यातील कारेगाव येथील जमीन संपादित करण्यात आली होती. या धरणातून मिळणाऱ्या पाण्याने ठाणे-मुंबई परिसराची तहान भागली मात्र त्यानंतर १६ वर्षे या प्रकल्पात बाधित झालेल्या आदिवासी कुटुंबांना कोणताही मोबदला मिळाला नाही. बाधित जमिनीवर ही कुटुंबे वर्षानुवर्षे पारंपरिक पद्धतीने शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होती मात्र प्रकल्पात जमीन गेल्याने त्यांचे उत्पन्नाचे साधनही गेले आणि मोबदलाही मिळाला नाही. जमिनीचा मोबदला मिळावा, कुटुंबातील तरुणांना नोकऱ्या मिळाव्यात यासाठी त्यांनी अखेर ठाण्यात येऊन आमदार संजय केळकर यांची भेट घेत निवेदन दिले. केळकर यांनी या प्रकरणी तत्काळ लक्ष घालत मुंबई महापालिकेच्या आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच याबाबत सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून मुंबई महापालिकेने बाधित कुटुंबांतील १८ तरुणांना नियुक्ती पत्रे दिली. या कुटुंबांच्या सदस्यांनी ठाण्यात आमदार केळकर यांची भेट घेऊन आभार मानले. गेली १७ वर्षे आम्ही सरकार दरबारी खेटे घालत होतो, मात्र न्याय मिळत नव्हता. आमदार संजय केळकर यांनी तत्काळ हालचाल करून आमच्या तरुणांना नोकऱ्या मिळवून दिल्या. एक पिढी सक्षम करण्याचे काम केळकर साहेबांनी केले, अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या. महादू झुगरे, नंदू सराई, देवचंद कातवारे, प्रवीण झुगरे, रुपेश शिद, अंकुश वळवी, बुधा आघान, रवींद्र झुगरे, कैलास वाजे, संदीप वाजे, दविदास फसाळे, रविदास वाजे, सुनील वाजे, गुरुदेव खडके, राजू कामडी, आकाश सराई, अंकुश झुगरे आणि पुंडलिक फसाळे अशी १८ लाभार्थ्यांची नावे असून त्यांना मुंबई महापालिकेच्या पाणी पुरवठा खात्यात सेवेत घेण्यात आले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading