मुंबईसह संपूर्ण राज्यात क्लोज सर्कीट कॅमेरे बसवावेत अशी मागणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे धर्मराज्य पक्षानं केली आहे. धर्मराज्य पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी एका पत्राद्वारे ही मागणी केली आहे. शहरातील ७० टक्के क्लोज सर्किट कॅमेरे बंद असल्याची बाब उघड झाली असून कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीनं ही गंभीर बाब आहे. ठाण्यामध्ये जर ही परिस्थिती असेल तर मुंबईसह राज्यात किती भयावह परिस्थिती असावी. २०११ मध्ये तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांनी स्कॉटलंड यार्ड पोलीसांच्या कार्यशाळेला उपस्थिती लावली होती. स्कॉटलंडमध्ये १९६७ ला सर्वप्रथम क्लोज सर्किट कॅमेरे बसवण्यात आले. तिथली सुरक्षा व्यवस्था ही फ्रेंडली सिक्युरिटी सारखी भासते. आपल्याकडे काही घडलं की सर्वसामान्यांना त्याठिकाणी प्रवेश करण्यास मज्जाव केला जातो. त्यामुळं तिथल्या संसदेत लोक बाजारात फिरल्यासारखे फिरतात असे पाटील यांनीच सांगितले होते. त्यावेळी मुंबईतही सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय आर आर पाटील यांनी बोलून दाखवला होता. मुंबईत घडलेल्या बॉम्बस्फोटानंतर आर आर पाटील यांनी मुंबईच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत पावलं उचलण्यास सुरूवात केली होती. मात्र नंतरच्या राज्य सरकारांनी त्याबाबत गांभीर्यानं कारवाई केल्याचं जाणवलं नाही. करदात्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी मुंबईसह संपूर्ण राज्यात उच्च दर्जाचे क्लोज सर्किट कॅमेरे बसवावेत अशी मागणी नितीन देशपांडे यांनी केली आहे.