मीटर रिडींगच्या बहाण्याने घरात शिरलेल्या अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल न करता सोडून देण्याच्या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी नगरसेविका परिषा सरनाईक यांनी पोलीस आयुक्तांकडे एका पत्राद्वारे केली आहे. वर्तकनगर परिसरात गेल्या दोन वर्षापासून महानगर गॅसची जोडणी सुरू आहे. गॅसच्या मीटर रिडींगच्या बहाण्याने खोटे ओळखपत्र दाखवून घरामध्ये शिरून चोरी करणं किंवा एटीएम कार्ड चोरून एटीएम मधून पैसे काढणं असे प्रकार घडत आहेत. बहुतांश घरांमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि महिला असल्यामुळे या प्रकारामुळे येथील नागरिक हवालदिल झाले आहेत. या परिसरातील नागरिकांच्या सतर्कतेमुळे संशयास्पद व्यक्तीला पकडून पोलीसांच्या हवाली करण्यात आले होते. मात्र ही व्यक्ती पाणी पिण्याच्या बहाण्याने पळून गेली. या व्यक्तीवर कोणतीही कारवाई न करता पोलीसांनी कसंकाय सोडून दिले, पोलीस असे बेजबाबदार कसे वागू शकतात असा प्रश्न उपस्थित करत याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी परिषा सरनाईक यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.