राष्ट्रवादीमुळेच नरेश म्हस्के ठाण्याचे बिनविरोध महापौर झाल्याचा त्यांना विसर – आनंद परांजपेंचा टोला

नरेश म्हस्के हे ठाण्याचे बिनविरोध महापौर राष्ट्रवादीमुळेच झाले आहेत असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी लगावला आहे. मंगळवारी महासभा सुरु असताना राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आंदोलन केले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना महापौर नरेश म्हस्के यांनी आपणाला राष्ट्रवादीची गरज नाही असे विधान केले होते. त्यांच्या या विधानाचा आनंद परांजपे यांनी चांगलाच समाचार घेतला. आनंद परांजपे यांनी सांगितले की, विस्मृती ही देवाने मानवाला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे महापौर नरेश म्हस्के! ज्या वेळी महापौरपदाची निवडणूक झाली. त्यावेळी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना फोन करुन शिवसेनेचा महापौर बिनविरोध व्हावा, अशी विनंती केली होती. त्यानंतर 17 नोव्हेंबर 2019 रोजी एकनाथ शिंदे आणि उमेदवार म्हणून नरेश म्हस्के हे तत्कालीन विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांच्या दालनात आले. त्यावेळी आपणांसह गटनेते नजीब मुल्ला आणि राष्ट्रवादीचे नगरसेवकदेखील उपस्थित होते. त्यावेळी शिंदे आणि म्हस्के यांनी, “राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत आहे; त्यामुळे ठाण्यातही महापौरपदाची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी विनंती केली. त्यानुसार राष्ट्रवादीने निवडणुकीतून माघार घेत शिवसेनेला महापौरपद बिनविरोध दिले. त्यानंतर 21 नोव्हेंबर 2019 रोजी नरेश म्हस्के हे महापौर झाले. शिवसेनेच्या राजवटीत जी काही अनागोंदी चालली आहे. त्याची पोलखोल ठाणेकरांसमोर करावी लागणारच आहे. अन् ती आम्ही करीत आहोत. कोविडच्या काळात प्रशासनाकडून अनागोंदी कारभार करण्यात आला आहे आणि शासन म्हणून शिवसेनेचा त्यांच्यावर वचक नव्हता. सत्ताधारी शिवसेना दुटप्पी भावनेने वागत आहे; लसीकरण, विकासनिधीमध्ये सेनेकडून राजकारण केले जात आहे. याचा आक्रोश कधी ना कधी होणारच होता.कालच्या महासभेत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे बोलणे सुरु असताना सचिवांकडून महापौरांच्या इशार्‍यावरुन आवाज बंद केला गेला. म्हणून त्यांचा आवाज महासभेपर्यंत पोहचावा यासाठी राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक सभागृहात घुसले होते. शिवसेनेच्या शाखा-शाखांमधून लसीकरण होत असताना राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी लसीसाठी मागणी केली की ती नाकारली जाते. लसीकरणाच्या ज्या चार बसेस आहेत. त्यापैकी दोन प्रशासनाने ठेवल्या आहेत. तर, दोन बसेस महापौरांनी स्वत:च्या अधिकारात ठेवल्या आहेत. त्या बसेसदेखील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना देण्यात आल्या नाहीत, म्हणूनच काल हा आक्रोश झाला. महापालिका आयुक्त अनागोंदी कारभार करीत आहेत आणि सत्ताधारी शिवसेनेचा त्यांच्यावर वचक नाही. त्यामुळेच सक्षम विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी महासभेत आणि ठाणेकरांसमोर चुकीच्या निर्णयाला विरोध करेल असा इशाराही आनंद परांजपे यांनी दिला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading